Tuesday, October 28, 2025

भक्ती आणि जबाबदाऱ्या: स्त्रीच्या आयुष्यातला अदृश्य संग्राम

भक्तीमार्ग! 'हरे कृष्ण' महामंत्राचा जप, सात्विक आहार आणि भगवंतांची सेवा... ऐकायला किती सुंदर आणि शांती देणारा हा मार्ग! पण एका स्त्री भक्तासाठी, मग ती नोकरी करणारी असो वा गृहिणी, हा मार्ग केवळ आध्यात्मिक नसून अनेक अग्निदिव्यांची मालिका असतो.

कडक नियम आणि त्यासोबतच एका स्त्रीला घर, कुटुंब आणि संसार सांभाळण्यासाठी करावी लागणारी कामे पाहिल्यास, तिचे जीवन एखाद्या 'तपश्चर्ये'पेक्षा कमी नाही. 

भक्ती आणि संसाराचा हा समन्वय साधताना तिच्यावर किती प्रचंड ताण येतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे...

भक्तीचे कठोर नियम आणि वेळेशी स्पर्धा:

  • एका कृष्णभक्ताला पाळावे लागणारे नियम अत्यंत कडक आहेत. पहाटे 'ब्रह्म मुहूर्तावर' उठून मंगळारतीला उपस्थित राहणे, लगेच तुळशी आरती करणे. यानंतर रोज दोन तास जप करणे!
  • सकाळच्या कामांची घाई (नवऱ्याचा टिफिन, मुलांची तयारी, सासू-सासऱ्यांची सेवा) आणि जपासाठीचा दोन तासांचा वेळ... ही वेळेची तारेवरची कसरत आहे.
  • कांदा-लसूण वर्ज्य. बाहेरचे काही खाणे नाही. कुटुंबासाठी साधा स्वयंपाक करायचा, देवाला दर वेळी चार वेळा भोग दाखवून मगच खायचे.
  • सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः मंदिराजवळ, पूर्णपणे झाकलेले कपडे घालावे लागतात, वेस्टर्न कपडे टाळणे. याचा अर्थ समाजाकडून, इतर भक्तांकडून तिच्या पेहरावावर सतत लक्ष ठेवले जाते. इतकेच काय, तिच्या ओळखीच्या कोणालाही ती 'चहा-कॉफी' पिताना दिसू नये, जेणेकरून 'त्यांचे' नाव खराब होऊ नये, ही भीती तिला सतत बाळगावी लागते.
  • खोटे न बोलणे, सतत महामंत्राचा जप करणे, टीव्ही/सोशल मीडियापासून दूर राहणे - हे नियम आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असले तरी, जगाशी जोडलेल्या व्यक्तीला (विशेषतः मुलांना सांभाळणाऱ्या आईला) व्यावहारिक जगात वावरताना हा ताण वाढवतो.

या भक्तीच्या नियमांशिवाय तिला संसाराची जबाबदारी पार पाडावी लागते:

  • नवऱ्याची तयारी करणे, टिफिन बनवणे, त्यांना वेळेवर ऑफिसला पाठवणे.
  • भांडी, कपडे, घरची साफसफाई.
  • मुलांना शाळेत सोडणे, त्यांचा अभ्यास घेणे,
  • घरात आई-वडील असल्यास त्यांची काळजी घेणे.
  • रात्रीचे जेवण आणि इतर तयारी.

भक्तीमार्ग एका स्त्रीला पूर्णवेळ भक्तीमध्ये राहण्याची मागणी करतो, पण संसाराच्या जबाबदाऱ्या तिला पूर्णवेळ संसारात अडकवतात.

ती एकही क्षण स्वतःसाठी जगू शकत नाही. तिला शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळत नाही. सतत नियमांचे पालन आणि वेळेचे बंधन यामुळे ती अति-तणावाखाली (over-stressed) राहते.

उद्देश:

कोणताही धर्म किंवा भक्तीमार्ग मनुष्याच्या जीवनात शांती आणि आनंद आणण्यासाठी असतो, ताण देण्यासाठी नाही. स्त्रीने भक्ती करावीच, पण देवाने कधीही कुटुंबाची आणि जबाबदाऱ्यांची उपेक्षा करायला सांगितलेली नाही.

स्त्री भक्ताला भक्तीच्या नावावर स्वतःला जाळून टाकण्याची गरज नाही. जर भक्तीचा मार्ग इतका ताण देत असेल की त्यामुळे कुटुंबात आणि तिच्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असेल, तर नियम थोडे शिथिल करणे किंवा त्यांचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे.

भक्ती म्हणजे प्रेम. आणि हे प्रेम तिला तिची दैनंदिन कामे आनंदाने करण्याची शक्ती देणारे असावे, तिला थकवणारे आणि दडपणारे नसावे. स्त्रियांनी यावर विचार करणे गरजेचे आहे की, 'दोन तास जप' आवश्यक आहे की, 'आनंदी राहून कुटुंबाची सेवा' करत राहणे आणि दिवसातून मिळेल तेवढा वेळ शुद्ध मनाने जप करणे, हे जास्त महत्त्वाचे आहे.

खरं पाहता, स्त्रीचे हे जीवन म्हणजे त्याग, समर्पण आणि भक्तीचा अत्यंत खडतर मार्ग आहे, ज्यासाठी तिला कोणीही 'सुपरवुमन'चा किताब देत नाही. तिच्या या संघर्षाला आणि त्यागाला सलाम!

No comments: